धाराशिव : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मराठवाड्याच्या विकासाच्या मुद्द्यावर सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची तयारी सुरू केली आहे. ‘मराठवाड्याचा विकास : तुमसे ना हो पायेगा!’ या मराठवाडाव्यापी आंदोलनाच्या तयारीसाठीआमदार कैलास पाटील , सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिकांची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत आंदोलनाची व्यापक तयारी, नियोजन तसेच सरकारच्या मराठवाड्याबाबतच्या कथित उदासीन धोरणाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे या बैठकीची माहिती देताना मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
‘आश्वासने आणि भूमिपूजनांचा दिखावा पुरे; जमिनीवरचा विकास दाखवा’
मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या सरकारने या भागातील जनतेला नेमके काय दिले, याचा हिशेब मागण्याची वेळ आली आहे, अशी टीका कैलास पाटील यांनी केली आहे. वर्षानुवर्षे आश्वासने, घोषणा आणि भूमिपूजनांचा सिलसिला सुरू असला तरी मराठवाड्याचे मूलभूत प्रश्न अद्याप कायम असल्याचा दावा त्यांनी केला.
सिंचनाचा अनुशेष, शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रश्न, रोजगाराची कमतरता, उद्योगांचा अभाव, आरोग्य आणि शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा तसेच पाण्याचा गंभीर प्रश्न याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.

मुक्तीसंग्रामाच्या त्यागाची आठवण; विकासाच्या हक्कांसाठी पुन्हा संघर्ष
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा निजामाच्या जुलमी राजवटीविरोधात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देणारा दिवस आहे. ज्या भूमीतील जनतेने स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, त्याच जनतेला आज विकासाच्या मूलभूत हक्कांसाठी पुन्हा संघर्ष करावा लागत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
सरकारने मराठवाड्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याऐवजी केवळ आकडे, घोषणा आणि आश्वासनांच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे ‘कागदावरील विकास नको, प्रत्यक्ष जमिनीवर झालेला विकास दाखवा’, अशी भूमिका शिवसेना (UBT) आंदोलनाच्या माध्यमातून मांडणार आहे.
पाणी, निधी, सिंचन आणि रोजगाराचा हिशेब मागणार
या आंदोलनाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या हक्काचा निधी, पाणी, सिंचन, रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. आंदोलनात पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.
बैठकीला भारत (नाना) इंगळे, संजय (मामा) निंबाळकर, भारत सांगळे, प्रदीप बप्पा मेटे, जगन्नाथ गवळी, अमोल बिराजदार, रवी वाघमारे, राज अहमद पठाण, जगदीश शिंदे, विलास थोरबोले, पांडुरंग भोसले, अण्णा पवार, अमोल मुळे, बिभीषण देशमुख यांच्यासह विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नाला पुन्हा राजकीय केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न शिवसेना (UBT) कडून केला जात असल्याने आगामी काळात सरकार आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावर आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.






