धाराशिव | महाराष्ट्रभर गाजलेल्या कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज (१६ जून) ऐनवेळी ४ दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला. हा निकाल नेमका का लांबला? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, आता न्यायालयाच्या अधिकृत कामकाजाची माहिती (Court Summary) समोर आली आहे. “निकालाचे डिक्टेशन (लेखन) अद्याप पूर्ण झालेले नाही,” असे स्पष्ट कारण विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिले असून, आता अंतिम निकालासाठी २० जून २०२६ ही तारीख निश्चित केली आहे.
...म्हणून न्यायालयाला घ्यावी लागली नवीन तारीख
मुंबईतील विशेष सत्र न्यायालय (रूम नंबर ५५) मध्ये आज सकाळी ११.०० वाजता या खटल्याचे कामकाज सुरू झाले. सीबीआयचे विशेष सरकारी वकील (SPP) एजाज खान, मूळ फिर्यादीचे वकील पी. एम. गावड आणि माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ पैकी ८ आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते.
मात्र, निकाल न येण्यामागे न्यायालयाने ऑर्डरमध्ये स्पष्ट केले की, “The judgment is under dictation. It is not yet completed.” (निकालाचे लेखन अजून सुरू असून ते अद्याप पूर्ण झालेले नाही). त्यामुळे हा खटला २० जूनपर्यंत तहकूब करण्यात येत आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना २० जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे कडक आदेश दिले आहेत.
मुख्य शूटर व्हीसीद्वारे (VC) झाला हजर; बिहारच्या तुरुंग प्रशासनाला पत्र
या खटल्यातील आरोपी क्रमांक ६ आणि मुख्य शूटर पिंटू सिंग ऊर्फ महात्मा चौधरी हा या प्रकरणात जामिनावर असला, तरी दुसऱ्या एका गुन्ह्याखाली बिहारच्या सिवान मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. त्याला आज सकाळी प्रत्यक्ष हजर करण्यात आले नव्हते.
परंतु, दुपारनंतर १२.३० वाजता सिवान कारागृहाचे अधिकारी देवाशिष सिन्हा आणि विकास कुमार यांनी पिंटू सिंगला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (V.C.) द्वारे न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आता २० जून रोजी त्याला पुन्हा व्हीसीद्वारे किंवा प्रत्यक्ष हजर करण्यासाठी सिवान कारागृह अधीक्षकांना अधिकृत पत्र जारी केले असून, त्याची प्रत सीबीआयच्या वकिलांना दिली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांची भावूक पोस्ट
निकालाच्या या अनपेक्षित घडामोडींनंतर पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुकवर आपली भावना व्यक्त केली. “२० वर्षे १३ दिवस संघर्षाची, अपेक्षा न्यायाची. हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीविरुद्धचा संघर्ष आहे. आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या पण कोणत्याच निकालासाठी एवढा वेळ लागला नाही. खुन्यांना कठोर शिक्षा व्हावी, एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे,” अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला ‘कालबद्ध’ (Time Bound) पद्धतीने चालवला जात आहे. आता निकालाचे लेखन पूर्ण झाल्यानंतर २० जून २०२६ रोजी दुपारी या बहुप्रतीक्षित आणि ऐतिहासिक केसचा अंतिम फैसला होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.





