तुळजापूर: शहरातील खडकाळ गल्ली भागात मागील भांडणाच्या रागातून एका टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करत, मध्यस्थी करणाऱ्या साक्षीदारावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी आकाश रमेश अमृतराव (वय ३१, रा. खडकाळ गल्ली, तुळजापूर) आणि आरोपींमध्ये जुने वाद होते. याच कारणावरून दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास आरोपींनी आकाश यांना गाठले. त्यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी तिथे उपस्थित असलेले साक्षीदार अष्टविनायक जाधव हे मध्ये आले असता, आरोपींनी त्यांच्या उजव्या पायाच्या पोटरीवर अज्ञात हत्याराने गोळीबार केला. या हल्ल्यात अष्टविनायक जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी आकाश अमृतराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खालील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. गणेश देवानंद रोचकरी २. रोहीत विक्रम पवार ३. अक्षय सज्जन गायकवाड ४. अतिष पोपट भांगे ५. अजय बंडु क्षिरसागर ६. मल्हार गायकवाड ७. प्रसाद परमेश्वर ८. खंडु विश्वनाथ कांबळे (सर्व रा. तुळजापूर) ९. ओम कांबळे (रा. काक्रंबा, ता. तुळजापूर) १०. एक अज्ञात साथीदार (अंदाजे)
तुळजापूर पोलिसांनी या सर्व आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम १०९ (गुन्ह्यास प्रोत्साहन), ११८(१) (जीवे मारण्याचा प्रयत्न), ११५(२) (दुखापत करणे), १९१(१), १९१(२), १९१(३) (दंगल करणे), १९० तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, ५, २७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.





