तुळजापूर : भाविकांना ‘राहण्यासाठी रुम पाहिजे का?’ अशी विचारणा करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना तुळजापूर शहरातील घाटशीळ पार्किंग परिसरात घडली. ‘तू भाविकांना का बोलतोस’ याचा जाब विचारत या टोळक्याने तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केली आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. रविवारी (ता. ५ एप्रिल) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी सूरज दुशांत रसाळ (वय २५, रा. वेताळ नगर समाज मंदिराजवळ, तुळजापूर) या तरुणाने सोमवारी (ता. १३) तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पाच जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश कांबळे, साहिल शेख, लिलेश अमृतराव, भगवान पारधे आणि शंकर पारधे (सर्व रा. तुळजापूर, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूरज रसाळ हे रविवारी (ता. ५) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घाटशीळ पार्किंग परिसरात उभे होते. यावेळी ते दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ‘तुम्हाला राहण्यासाठी रुम पाहिजे का?’ असे विचारत होते. याच वेळी आरोपींनी तिथे येऊन ‘तू भाविकांना का बोलतोस?’ असे म्हणत सूरजशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादातून पाचही आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून सूरजला जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच, ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी जीवे मारण्याची धमकीही या टोळक्याने दिली.
घटनेनंतर उपचाराअंती सूरज रसाळ याने दिलेल्या प्रथम खबरीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११७(२), ३५२, ३५१(३), १८९(२), १९१(२), १९१(३) सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी – अ.जा.ज.प्र.का. कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्हीए)) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलिस करत आहेत.






