उमरगा : शेतातून ट्रॅक्टर आणि जेसीबी नेण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद होऊन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उमरगा तालुक्यातील नारंगवाडी शिवारात रविवारी (ता. १०) दुपारी घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारींवरून उमरगा पोलीस ठाण्यात तब्बल आठ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत पहिली फिर्याद उमेश दिनकर ठाकूर (वय ३२, रा. नारंगवाडी) यांनी दिली आहे. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नारंगवाडी शिवारातील गट नं. २११/१४ मध्ये शेतातून ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी मुकेश सदानंद पवार, गजानन सदानंद पवार, सदानंद नामदेव पवार आणि संगीता नामदेव पवार (सर्व रा. नारंगवाडी) यांनी उमेश यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले व ‘तुला सोडणार नाही’ अशी धमकी दिली. या फिर्यादीवरून वरील चार जणांवर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, याच घटनेत दुसऱ्या गटाच्या वतीने मुकेश सदानंद पवार (वय ३१, रा. नारंगवाडी) यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. गट नं. २१५ मधील उसाच्या पिकातून जेसीबी आणि ट्रॅक्टर का घातले, अशी विचारणा मुकेश पवार यांनी केली होती. याचा राग आल्याने बालाजी ठाकूर, दिनकर ठाकूर, उमेश दिनकर ठाकूर आणि निलेश बालाजी ठाकूर (सर्व रा. नारंगवाडी) यांनी मुकेश यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि स्टीलच्या कळशीने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांनाही बघून घेण्याची धमकी दिली.
या परस्परविरोधी तक्रारींवरून उमरगा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील एकूण आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. शेतीच्या कारणावरून एकाच गावातील दोन गटांत हाणामारी झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.



