वाशी : ‘१५ लाख रुपये खंडणी दिली नाही, तर दिवसा भोसकून मारेन,’ अशी धमकी देत कंपनीच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना वाशी तालुक्यातील सरमकुंडी शिवारात शनिवारी (ता. १८) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी (ता. १९) वाशी पोलिस ठाण्यात एका नामनिर्देशित आरोपीसह इतर दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव सुहास भिंगाडे (वय ४३, मूळ रा. चिपळूण, जि. रत्नागिरी, हल्ली मुक्काम वाशी, जि. धाराशिव) असे फिर्यादीचे नाव आहे. तर पृथ्वीराज रमेश गपाट (रा. इंदापूर, ता. वाशी) आणि त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव भिंगाडे हे सरमकुंडी शिवारातील शेत गट नंबर १०८ (अ, ब, क, ड) व १०७ मध्ये असलेल्या ‘सेरेटिका रिन्युएबल इंडिया ५ प्रा. लि.’ या कंपनीच्या झिरो पॉईंटवर इतर साक्षीदारांसह कामकाज पाहत होते. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आरोपी पृथ्वीराज गपाट व त्याच्यासोबत आलेले दोन अनोळखी इसम यांनी संगनमत करून कंपनीच्या जागेत जबरदस्तीने घुसखोरी केली.
त्याठिकाणी आरोपींनी भिंगाडे यांना अडवून त्यांच्याकडे तब्बल १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच, त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. ‘जर खंडणी दिली नाही, तर दिवसा भोसकून मारतो,’ अशी जिवे ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली आणि तेथून पळ काढला.
या धक्कादायक प्रकारानंतर गौरव भिंगाडे यांनी वाशी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून रविवारी (ता. १९) आरोपी पृथ्वीराज गपाट व दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३३, ३०८(४), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलिस करत आहेत.





