वाशी : जिल्हा परिषद निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याचा राग मनात धरून बेकायदेशीर जमाव जमवून एकाला लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना वाशी तालुक्यातील ईट येथे घडली. शुक्रवारी (ता. २४) रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात १० नामनिर्देशित आणि २ अज्ञात अशा एकूण १२ जणांवर खुनाच्या प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील पोपटराव देशमुख (वय ४६, रा. ईट, ता. भूम, जि. धाराशिव) असे या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. २४) रात्री ९ वाजेच्या सुमारास सुनील देशमुख हे ईट येथील नागेवाडी चौकात होते. त्यावेळी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांना गाठले. जिल्हा परिषद निवडणुकीत आरोपीच्या पत्नीचा पराभव झाला होता, याच गोष्टीचा जुना राग मनात धरून आरोपींनी देशमुख यांच्याशी वाद उकरून काढला.
सुरुवातीला आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने सुनील देशमुख यांना लोखंडी रॉड आणि काठीने अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात देशमुख गंभीर जखमी झाले आहेत.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
याप्रकरणी सुनील देशमुख यांनी शनिवारी (ता. २५) वाशी पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. यावरून पोलिसांनी खालील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे:
-
आंद्रूड (ता. भूम) येथील रहिवासी: ज्ञानेश्वर सोपान गिते, बाळासाहेब बब्रुवान लिमकर, अशोक चव्हाण, प्रमोद गिरी, सुनील नलवडे, संभाजी नलवडे, भास्कर लिमकर, अविनाश अनभुले, निवृत्ती तावरे, विलास खोसे.
-
इतर: दोन अज्ञात इसम.
या सर्व १२ आरोपींविरुद्ध वाशी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ११५(२), ११८(१), ३५२, १९०, १८९(२), १९१(२), १९१(३), १२६(२) आणि ३५१(२), (३) अन्वये बेकायदेशीर जमाव जमवणे, गंभीर दुखापत करणे आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे ईट आणि आंद्रूड परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.





