येरमाळा: धाराशिव साखर कारखान्याच्या चोराखळीच्या मेन गेटसमोर एका तरुणाला राजेश वैद्य आणि त्याच्या पाच साथीदारांनी बेदम मारहाण केल्याची घटना १ जानेवारी २०२५ रोजी रात्री आठ वाजता घडली.
संकेत शामसुंदर शिंदे (वय २०, रा. शेलगाव) या तरुणाला ट्रॅक्टर लॉट सोडण्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉड, फायबरचे पितळी नोझल, दगड आणि काठीनेही त्याला जबर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात शिंदे जखमी झाला आहे.
एवढ्यावरच न थांबता आरोपींनी शिंदेच्या भावासही शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी शिंदे यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजेश वैद्य आणि इतर पाच जणांविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(१), १९०, १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूरमध्ये महिलेला मारहाण
तुळजापूर: कसई येथे राहणाऱ्या लखन निवृत्ती भोवाळ आणि रुतुजा लखन भोवाळ यांनी एका महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना १ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.
रेखा निवृत्ती भोवाळ (वय ४२, रा. तुळजापूर) या महिलेला तिची मुलगी रडत असताना तिला न घेण्याच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या हल्ल्यात रेखा गंभीर जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी रेखा भोवाळ यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून लखन आणि रुतुजा भोवाळ यांच्याविरुद्ध भादंवि कलम ११८(२), ११८(१), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.