धाराशिव: धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये चक्क आर्थिक तडजोड करून जप्त केलेली गाडी सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ‘अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती’ने केलेल्या तक्रारीवरून झालेल्या प्राथमिक चौकशीत पोलीस नाईक विष्णू मधूकर बेळळे यांचे वर्तन संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भातील चौकशी अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे, मात्र या गंभीर प्रकरणावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
नेमके प्रकरण काय?
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री. गणेश प्रभाकर पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात एक निवेदन दिले होते. या निवेदनानुसार, धाराशिव सिटी पोलीस स्टेशनमधील गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८६/२०२५ मधील कारवाईत काही मुद्देमाल जमा करण्यात आला होता. मात्र, काही आर्थिक तडजोड करून एक गाडी सोडून देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप पाटील यांनी केला. तसेच, पोलीस स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासून संबंधित पोलीस अंमलदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.
चौकशीत काय निष्पन्न झाले?
या निवेदनाची दखल घेत वरिष्ठ अर्ज क्रमांक १३०/२०२५ अन्वये नोंद घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीदरम्यान तक्रारदार गणेश पाटील आणि गैरअर्जदार पोलीस नाईक (बक्कल नं. ११९७) विष्णू मधूकर बेळळे यांचे समक्ष जबाब नोंदवण्यात आले. गुन्हा रजिस्टर नं. ४८६/२०२५ चा प्रथम खबर अहवाल आणि पुरवणी जबाब तपासले असता, या गुन्ह्यातील फिर्यादी असलेले पोलीस नाईक विष्णू बेळळे यांचे वर्तन प्रथमदर्शनी संशयास्पद असल्याचे धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.
अहवाल सादर, पण कारवाईची प्रतीक्षा
या प्रकरणी पुढील योग्य ती कारवाई होण्यासाठी धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (कुमार भ. दराडे) यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला अहवाल सादर केला आहे. याबाबतची रीतसर माहिती देणारे सूचनापत्र (जावक क्रमांक- ६५५/२०२६) १८ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रारदार गणेश पाटील यांना देण्यात आले आहे.
पोलिसांनी स्वतःच्याच कर्मचाऱ्याचे वर्तन संशयास्पद असल्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला असला तरी, यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाला पाठीशी घातले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत असून वरिष्ठ अधिकारी यावर नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.








