धाराशिवमध्ये ‘राणा प्रायव्हेट लिमिटेड’ विरुद्ध ‘निष्ठावंत’ असा मोठा महासंग्राम सुरू असतानाच, आता आणखी एका नव्या राजकीय बॉम्बची वात पेटली आहे. आणि ही वात पेटलीये थेट धाराशिव नगरपालिकेच्या कमळाच्या बागेत! २१ डिसेंबर २०२५ रोजी नगरपालिकेचा निकाल लागला. थेट नगराध्यक्षपदी भाजपच्या नेहा काकडे विराजमान झाल्या आणि जानेवारी २०२६ मध्ये अक्षय ढोबळे यांच्या गळ्यात उपनगराध्यक्षपदाची माळ पडली. पण आता हीच माळ साहेबांच्या गळ्याला फास ठरू लागली आहे!
सहा महिन्यांचा करार अन् एका महिन्याचा ‘ओव्हरटाईम’
नगरपालिकेत सत्ता आल्यावर भाजपच्या सर्व इच्छुकांना संधी देण्यासाठी ‘सहा महिन्यांचा उपनगराध्यक्ष’ असा एक अलिखित करार झाला होता. या करारानुसार अक्षय ढोबळे यांची मुदत संपून आता तब्बल एक महिना उलटून गेला आहे. पण तरीही साहेबांकडून नवीन उपनगराध्यक्ष निवडण्याच्या कोणत्याही हालचाली नाहीत. यामुळे सत्ताधारी भाजपच्या (राणा पाटील गटाच्या) नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली असून, कुजबूज आता थेट बंडाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
‘नाकापेक्षा मोती जड’ आणि अमित शिंदेंची फिल्डिंग!
या उपनगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक इच्छुक कोण असेल, तर ते आहेत अमित शिंदे! शिंदे हे धडाडीचे नगरसेवक आहेत. खरं तर सुरुवातीलाच त्यांना संधी मिळणे अपेक्षित होते. पण राजकारणात एक नियम असतो- ‘बॉसपेक्षा कार्यकर्ता जास्त स्मार्ट किंवा ॲक्टिव्ह नसला पाहिजे.’ याच न्यायाने, ‘नाकापेक्षा मोती जड नको’ म्हणून शिंदेंना त्यावेळी डावलण्यात आले. पण आता शिंदे शांत बसणाऱ्यांपैकी नाहीत; ते तगडी फिल्डिंग लावून बसले आहेत आणि “आता नंबर माझाच!” असा दावा करत आहेत.
पंचपक्वान्न साहेबांना अन् सत्ताधारी नगरसेवक उपाशी!
दुसरीकडे, नगरसेवकांच्या नाराजीचे मूळ कारण फक्त पद नाही, तर ‘निधी’ हेही आहे. शहरात तब्बल १४० कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. पण गंमत म्हणजे, ही सगळी कामे राणा पाटलांच्या एकाच ‘लाडक्या कंत्राटदारा’कडून केली जात आहेत.
याचा अर्थ असा की, साहेबांना लाडक्या कंत्राटकडून ‘पंचपक्वान्न’ मिळत आहे, पण ज्यांनी लोकांच्या शिव्या खाऊन मते मागितली, ते सत्ताधारी नगरसेवक मात्र निधीपासून पूर्णपणे ‘उपाशी’ आहेत! नवीन बजेट नाही, कामे नाहीत आणि विकास ठप्प… अशी अवस्था झाल्याने, “आम्ही फक्त नावालाच सत्ताधारी आहोत का?” असा सवाल आता हे नगरसेवक करू लागले आहेत.
ढोबळेंचीही नाराजी आणि ‘ओमराजें’ची धास्ती
विद्यमान उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे हे शहरातून घाण आणि कचरा काढण्यासाठी धडाडीने झटत होते. पण त्यांच्या या कामातही वारंवार सहकारी पक्षातीलच नगरसेवकांकडूनच आडकाठी आणली जात असल्याने तेही आतून प्रचंड नाराज आहेत.
पण नवीन निवडणूक घ्यायची म्हटली, तर साहेबांना सगळ्यात मोठी धास्ती कुणाची वाटत असेल, तर ती आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांची! पालिकेतील बलाबल पाहता, भाजपचे २२ नगरसेवक आहेत. पण विरोधी बाकांवर शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसचे १०, राष्ट्रवादी (शरद पवार गट) ८ आणि एमआयएमचा १ नगरसेवक आहे.
यात सर्वात मोठा धोका असा की, शिवसेना ठाकरे गटातील ७ पैकी जवळपास ६ नगरसेवक हे आतून ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर समर्थक आहेत! ओमराजेंनी जर ठरवले आणि भाजपमधील ५-६ नाराज नगरसेवकांना गळाला लावले, तर पालिकेत सत्तापालट होण्यास वेळ लागणार नाही. याच धास्तीमुळे ‘नवीन निवडणूक नको रे बाबा, आहे तसंच चालू द्या,’ अशी चालढकल साहेबांकडून सुरू असल्याची चर्चा आहे.
कुठं स्फोट होईल सांगता येत नाही!
थोडक्यात काय, तर साहेबांची अवस्था आता ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे. एकीकडे पक्षातील जुने निष्ठावंत रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसरीकडे पालिकेतील स्वपक्षीय नगरसेवक खदखदत आहेत. हा असंतोषाचा बॉम्ब कधी, कुठे आणि कसा फुटेल, हे कुणीच सांगू शकत नाही. आता या नव्या संकटातून साहेब कसे मार्ग काढणार, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे!




