राजकारणात एक अत्यंत जुनी आणि प्रसिद्ध म्हण आहे- ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात!’ या म्हणीचा लाईव्ह आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा प्रत्यय सध्या धाराशिव जिल्ह्यात तुळजापूरचे भाजप आमदार राणा पाटील यांना येत आहे. २०१९ मध्ये राष्ट्रवादीतून कमळाच्या बागेत प्रवेश केलेल्या राणा पाटलांची ‘हवा’ आता कुठेतरी गुल होताना दिसत आहे आणि याला कारण ठरलेत त्यांचेच दोन मोठे ‘शत्रू’- एक घरातला आणि दुसरा बाहेरचा!
‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचा फुसका बार!
२०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राणा पाटलांनी हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली. ज्यांनी रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला, त्या निष्ठावंत आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. त्याऐवजी, ‘जी हुजूर’ करणाऱ्या, ‘उठ’ म्हटलं की उठणाऱ्या आणि ‘बस’ म्हटलं की बसणाऱ्या बगलबच्च्यांना पोसून त्यांना मोठी पदे दिली.
याचाच स्फोट आता झाला असून, भाजपच्या जुन्या निष्ठावंतांनी या ‘राणा पाटील प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीविरुद्ध अधिकृत रणशिंग फुंकले आहे. “आमच्यामुळेच धाराशिवमध्ये भाजप आहे,” या त्यांच्या घमेंडीची हवा आता निष्ठावंतांनीच काढायला सुरुवात केली आहे.
‘दबंग’ ओमराजेंची सत्तेत एन्ट्री आणि अधिकाऱ्यांची ‘कल्टी’
गेली १२ वर्षे खासदार ओमराजे निंबाळकर हे विरोधी पक्षात होते. ते मनाने आणि कृतीने ‘दबंग’ आणि निष्ठावंत असले, तरी ‘सत्तेपुढे शहाणपण चालत नाही’ या नियमामुळे जनतेची आणि मतदारसंघाची अनेक कामे अडकत होती.
याच गॅपचा पुरेपूर फायदा राणा पाटलांनी उचलला. राज्यात सत्ता असल्यामुळे शासकीय अधिकारी राणांचा शब्द खाली पडू देत नव्हते आणि जिल्ह्यात त्यांचीच एकहाती ‘चलती’ होती. पण, २३ जून रोजी ओमराजेंनी मोठा राजकीय ‘गेम’ करत शिवसेना (ठाकरे गट) सोडून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्तेच्या गोटात प्रवेश केला… आणि इथेच राणा पाटलांच्या वर्चस्वाला सर्वात मोठा सुरुंग लागला!
अमित शहांनंतर थेट मोदींच्या दरबारात: ‘योग’ जुळून आला!
सत्तेत आल्यापासून ओमराजे दिवसेंदिवस ‘पॉवरफुल’ होत आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन धाराशिवच्या विकासाचे प्रश्न मांडले. आणि आता तर त्यांनी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या अल्पोपहार कार्यक्रमात हजेरी लावली!
पंतप्रधानांनी ओमराजेंच्या विकासकामांच्या निवेदनावर सकारात्मक चर्चा तर केलीच, पण “कोणतीही अडचण आल्यास थेट PMO (पंतप्रधान कार्यालयाशी) संपर्क साधा,” असा ‘व्हीआयपी पास’ही दिला. या सगळ्यात सर्वात लक्षवेधी ठरला तो पंतप्रधानांचा एक प्रश्न! मोदींनी अत्यंत आपुलकीने ओमराजेंच्या नियमित योगाभ्यासाची चौकशी केली. इकडे दिल्लीत ओमराजेंचा असा ‘राजकीय योग’ जुळून येत असताना, धाराशिवमध्ये मात्र राणा गटाची चांगलीच ‘आसने’ बिघडल्याची चर्चा आहे.
‘फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुप’ आणि ट्रोलिंगचा ‘बूमरँग’
जेव्हा ओमराजे शिंदे गटात येणार हे निश्चित झाले, तेव्हा राणा पाटील गटाकडून त्यांच्यावर सोशल मीडियावर प्रचंड आणि घाणेरडे ट्रोलिंग करण्यात आले. हे ट्रोलिंग कसे चालते? तर याची एक भन्नाट कार्यपद्धती आहे!
राणा पाटील यांचा एक ‘फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुप’ आहे. यात स्वतः साहेब, माऊली (जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील), ‘मल्हार पर्व’ म्हणून मिरवणारे भावी खासदार (चिरंजीव मल्हार पाटील) आणि त्यांचे काही निवडक ‘बगलबच्चे’ असतात. या ग्रुपवर रोज लाईन ठरते- “आज कुणाला ट्रोल करायचं? काय पोस्ट टाकायची?” आणि मग खाली त्यांचे चेल्ये त्याची अंमलबजावणी करतात.
पण आता निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जो चिखल फेकता, तो कधीतरी तुमच्यावरच उडतो. आता हेच ट्रोलिंग थेट राणा कुटुंबावर ‘बूमरँग’सारखं उलटलं आहे.
कात्रीत सापडलेले राणा साहेब!
थोडक्यात काय, तर राणा पाटील आता दोन्ही बाजूंनी वाईट पद्धतीने कात्रीत सापडले आहेत.
-
पहिली कात्री: स्वतःच्याच पक्षात निष्ठावंतांनी पुकारलेले ऐतिहासिक बंड!
-
दुसरी कात्री: कट्टर विरोधक ओमराजे निंबाळकर यांचे सत्तेतील आणि दिल्लीतील वाढते वजन!
एकीकडे पक्षातून आणि दुसरीकडे ओमराजेंकडून असे दोन्ही बाजूंनी खच्चीकरण सुरू असल्याने, आता या दुहेरी संकटातून बाहेर पडण्यासाठी साहेबांच्या ‘फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुप’वर पुढची कोणती लाईन ठरते, हे पाहणे अतिशय मनोरंजक ठरणार आहे!



