धाराशिव भाजपमधल्या या ‘पॉवर प्ले’मध्ये काल रात्री (गुरुवारी) जो काही खेळ झाला, त्याने जुन्या निष्ठावंतांच्या रागाचा पारा थेट सातव्या आस्मानावर पोहोचवला आहे. हायकमांडने पाठवलेले दूत सुनील राणे हे निष्ठावंतांच्या खदखदीवर फुंकर घालतील अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्ष बैठकीत राणा गटाच्या ‘फिल्डिंग’ने आणि राणेंच्या ‘गुगली’ने या बैठकीचा पार फज्जा उडवला!
बीडच्या वाटेवर ‘हायजॅक’ आणि बांधावरचा टाईमपास!
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे हे सायंकाळी ५ वाजता येणार म्हणून निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या तक्रारी आणि ‘स्क्रीनशॉट’च्या फाईल्स घेऊन रायगड फंक्शन हॉलमध्ये सज्ज होते. पण घड्याळात ८ वाजले तरी राणे साहेबांचा पत्ता नव्हता! राणे साहेब गेले कुठे होते?
याचे उत्तर म्हणजे राणा पाटील यांच्या चेल्यांनी लावलेली सुपर-डुपर ‘फिल्डिंग’! राणे साहेब बीडहून धाराशिवला येत असताना, राणा गटाने अचूक टायमिंग साधले. राणेंना थेट हॉलवर नेण्याऐवजी, “साहेब, चला शेतकऱ्यांशी संवाद साधूया,” असे सांगून त्यांना थेट शेताच्या बांधावर नेण्यात आले. मुळात ज्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’वरून शेतकरी जाचक अटींमुळे त्रस्त आहेत, त्याच योजनेचा ‘मुठभर’ लोकांचा मेळावा घेऊन राणेंना गुंतवून ठेवण्यात आले.
या ‘कव्हर-अप’ ऑपरेशनचे पुरावे खुद्द भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या पोस्टमधूनच समोर आले. दत्ताभाऊंनी सोशल मीडियावर मोठ्या थाटात एक पोस्ट टाकली:
“मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राबविलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’च्या पार्श्वभूमीवर सुनीलजी राणे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता…
कर्जमाफीची ओरड अन् ‘मुठभर’ लोकांचा मेळावा

मुळात ही कर्जमुक्ती योजना कशी फसवी आहे आणि जाचक अटींमुळे शेतकरी कसे त्रस्त आहेत, याची ओरड संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. पण मूळ विषयाला (निष्ठावंतांच्या बंडाला) बगल देण्यासाठी मुठभर कार्यकर्त्यांना गोळा करून हा ‘शेतकरी मेळावा’ उरकण्यात आला. राणेंना गुंतवून ठेवण्याचा राणा गटाचा हा ‘टाईमपास प्लॅन’ १०० टक्के यशस्वी झाला.
रिकाम्या खुर्च्या आणि वैतागलेले निष्ठावंत
या चार तासांच्या टाईमपासचा सर्वात मोठा फटका कोणाला बसला असेल, तर तो बैठकीसाठी आलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, तसतशी कार्यकर्त्यांची सहनशीलता संपत होती. अखेर, तासन् तास वाट पाहून वैतागलेले अनेक निष्ठावंत कार्यकर्ते बैठक सुरू होण्यापूर्वीच हॉलमधून निघून गेले. म्हणजेच, ‘आधीच गर्दी कमी करा आणि मग बैठक घ्या,’ हा राणा समर्थकांचा अजेंडा इथे तंतोतंत लागू पडला.
राणेंची ‘गुगली’ आणि जेवणाच्या ताटावर गुंडाळला पक्ष!
रात्री ९ वाजता जेव्हा राणे साहेब अखेर हॉलवर पोहोचले, तेव्हा निष्ठावंतांना वाटले आता तरी आपल्या व्यथा मांडता येतील. बैठकीच्या सुरुवातीला राणा पाटील यांचे दोन कार्यकर्ते बोलले आणि सगळं कसं ‘आलबेल’ आहे, हे सांगून मोकळे झाले. पण जेव्हा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि अन्य निष्ठावंत कार्यकर्ते आपले मुद्दे मांडण्यासाठी सरसावले, तेव्हा राणेंनी अशी एक ‘गुगली’ टाकली की सर्वजण क्लीन बोल्ड झाले!
राणे साहेब अत्यंत शांतपणे म्हणाले, “पहा, आज इथे आमदार राणा पाटील उपस्थित नाहीत. ते समोर नसताना त्यांच्याबद्दल तक्रारी करणे योग्य नाही. तुमच्या ज्या काही भावना आहेत, त्या आपण नंतर कधीतरी त्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मांडूया!”
हे ऐकताच हॉलमध्ये एकच सन्नाटा पसरला. या एका वाक्याने बैठकीतील हवाच काढून घेतली आणि “अरेरे… आता खूप उशीर झालाय! चला, चला… जेवायला चला!” अशी आरोळी ठोकत ही संपूर्ण बैठक अत्यंत शिताफीने ‘जेवणाच्या ताटावर’ गुंडाळण्यात आली!
निष्ठावंतांचा संताप: “आता थेट बावनकुळे किंवा चव्हाणच हवेत!”
राणे साहेबांचा हा युक्तिवाद ऐकून निष्ठावंतांच्या संतापाचा अक्षरशः भडका उडाला आहे. कार्यकर्त्यांचा थेट सवाल आहे की, “जर राणा साहेब परदेशात आहेत हे तुम्हाला माहीत होते आणि ते नसताना बैठक घ्यायचीच नव्हती, तर मग तुम्ही धाराशिवपर्यंत येण्याची तसदीच का घेतली? साहेब, तुम्ही नक्की कशासाठी आला होतात?”
सुनील राणे यांच्या या भूमिकेनंतर धाराशिवच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्षाच्या दूतांवरचा विश्वासच उडाला आहे. यामुळेच संतापलेल्या कार्यकर्त्यांनी आता थेट हायकमांडलाच साद घातली आहे. “आता आम्हाला कोणतेही दूत नकोत! हा विषय आता थेट राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण किंवा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच उपस्थितीत मार्गी लागला पाहिजे,” अशी आक्रमक मागणी निष्ठावंतांनी उचलून धरली आहे.
थोडक्यात सांगायचे तर, ‘राणा प्रायव्हेट लिमिटेड’ विरुद्ध ‘निष्ठावंत’ या लढाईचा चेंडू आता थेट मुंबईत हायकमांडच्या कोर्टात जाऊन पडला आहे. आता कमळातील हा ‘काटा’ वरिष्ठ नेते कसा काढणार, याकडेच संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे!