धाराशिव भाजपमधल्या या राजकीय वेबसिरीजचा प्रत्येक एपिसोड आता अधिकाधिक उत्कंठावर्धक होत चालला आहे. एकीकडे हायकमांडचे दूत सुनील राणे यांचा ‘लेटमार्क’ आणि दुसरीकडे राणा साहेबांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेली डॅमेज कंट्रोलची धडपड, यातच माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी माऊलींना (अर्चना पाटील) असा काही ‘ॲटम बॉम्ब’ फेकून मारलाय, की राणा गटाला आता खरोखरच तोंड लपवायला जागा उरलेली नाही!
५ ची वेळ, ८ वाजले; राणे साहेबांचा ‘लेटमार्क’ आणि ‘मनधरणी’चे पेव!
पक्षाने हा वाद मिटवण्यासाठी (किंवा कानउघाडणी करण्यासाठी) प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांना धाराशिवला पाठवले. राणे साहेब सायंकाळी ५ वाजता येणार म्हणून निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या तक्रारी, पुरावे आणि ‘स्क्रीनशॉट’च्या फाईल्स घेऊन रायगड फंक्शन हॉलमध्ये सज्ज होते. पण घड्याळात ८ वाजले तरी राणे साहेबांचा पत्ता नव्हता!
इकडे राणेंना उशीर होत असल्याचा फायदा घेत, राणा पाटील यांच्या काही ‘ठराविक’ आणि मोजक्या कार्यकर्त्यांनी डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली. निष्ठावंतांच्या गळ्यात पडून, “अहो साहेब, झाले गेले विसरून जा… पक्षात असं चालायचंच… राणे साहेबांसमोर जास्त काही बोलू नका,” अशी केविलवाणी मनधरणी सुरू झाली. कालपर्यंत जे ‘मल्हार पर्व’ आणि ‘भावी खासदार’च्या हवेत उडत होते, ते आता थेट निष्ठावंतांचे पाय धरण्याच्या भूमिकेत आल्याचे चित्र दिसत होते. पण वर्षानुवर्षे अपमान गिळून बसलेले निष्ठावंत आज काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
ठाकुरांचा ‘ॲटम बॉम्ब’: “तुमच्यावर इकडे येण्याची वेळ का आली, ते आठवा!”
इकडे मनधरणी सुरू असतानाच, तिकडे सोशल मीडियावर माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी माऊलींच्या त्या ‘३० वर्षांत तुम्ही काय केलं?’ या प्रश्नाचा असा काही पंचनामा केला, की बास! ठाकुरांनी थेट भूतकाळाच्या नाड्या आवळत राणा गटाला त्यांची ‘राजकीय औकात’च दाखवून दिली.
ठाकूर आपल्या सडेतोड उत्तरात म्हणतात:
“३० वर्षे निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांनी काय केलं, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी स्वतःचा राजकीय प्रवास आठवावा. ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून भाजप गावागावात पोहोचवला, त्याच कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे अनेकांना स्वतःचा पक्ष (राष्ट्रवादी) सोडून भाजपमध्ये यावं लागलं!”

‘ताईसाहेब… त्याग ओळखायला शिका!’
ठाकुरांचा हा मुद्दा इतका लॉजिकल आणि धारदार होता की त्यावर कोणाकडेच उत्तर नव्हते. थोडक्यात सांगायचे तर- “तुम्ही येऊन भाजप मोठा केला नाही, तर जुन्या कार्यकर्त्यांनी भाजप इतका मोठा केला होता, म्हणूनच तुम्हाला तुमची बुडती बोट सोडून भाजपच्या जहाजात उडी मारावी लागली,” हा तो स्पष्ट संदेश होता.
ठाकूर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अत्यंत सूचक शब्दांत माऊलींच्या अहंकाराला थेट भिडताना म्हटले, “भाजपमध्ये येण्याची वेळ तुमच्यावर आली, हेच त्या जुन्या कार्यकर्त्यांच्या ३० वर्षांच्या संघर्षाचं आणि निष्ठेचं सर्वात मोठं उत्तर आहे. संघर्ष केलेल्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांच्या त्यागाचा सन्मान करायला शिका. कारण पक्षाची पायाभरणी करणारे कार्यकर्ते नसते, तर आज भाजपमध्ये येण्याची संधीही तुम्हाला निर्माण झाली नसती… ताई साहेब!“
शेवटी वापरलेला ‘ताई साहेब’ हा शब्द माऊलींच्या जिव्हारी लागण्यासाठी पुरेसा होता. “आम्ही तुम्हाला ‘माऊली’ म्हणून डोक्यावर घेतलं, पण तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसलात,” हीच भावना या ‘ताई साहेब’ शब्दातून व्यक्त होत होती.
आता लक्ष राणेंच्या ‘एन्ट्री’कडे!
आता रात्रीचे आठ वाजून गेले आहेत. राणे साहेब कधी येणार? आणि जेव्हा ते येतील, तेव्हा साहेबांच्या दूतांची ही ‘मनधरणी’ कामी येणार की ठाकुरांच्या या नव्या बॉम्बमुळे राणेंच्या समोरच निष्ठावंतांचा ज्वालामुखी फुटणार? धाराशिवच्या या कुरुक्षेत्रावर आज रात्री नक्की कुणाचा बळी जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे!




