धाराशिव : महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी धाराशिवमध्ये आलेले राज्याचे परिवहन व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना आज (१ मे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळबळजनक निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयात तब्बल ६ हजार बोगस कामगारांची नोंदणी झाल्याचा आरोप मनसेने केला असून, याप्रकरणी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मनसेचे धाराशिव शहराध्यक्ष निलेश जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयात मोठा घोटाळा सुरू आहे. धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी आणि जुनोनी या ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक आणि काही दलाल व एजंट यांनी संगनमत करून, बनावट सही आणि शिक्क्यांचा वापर करून तब्बल ६००० बोगस कामगारांची नोंदणी केली आहे.
अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरही कारवाई शून्य
या संपूर्ण बोगस नोंदणी प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवकांवर आणि धाराशिव जिल्ह्यातील दलालांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी जिल्हा कामगार अधिकारी गोविंद गावंडे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सात दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
मनसेचा आंदोलनाचा इशारा
जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडून कारवाईस टाळाटाळ होत असल्याने आता थेट पालकमंत्र्यांकडे ही तक्रार करण्यात आली आहे. प्रशासनाने आणि शासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ कारवाई न केल्यास, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शहराध्यक्ष निलेश जाधव यांनी दिला आहे.









