धाराशिव: खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे गटातील संभाव्य प्रवेशाने केवळ मुंबई-दिल्लीच नाही, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे राजकीय समीकरण मुळापासून हादरले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २० जूननंतर कधीही ओमराजे अधिकृतपणे धनुष्यबाण हाती (शिंदे गट) घेणार आहेत. पण, हा केवळ एका खासदाराचा प्रवेश नसेल, तर धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे सेनेला लागलेले हे मोठे खिंडार असणार आहे. ओमराजेंच्या या एकाच खेळीमुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ठाकरेंची सत्ता पत्त्यांसारखी कोलमडण्याची चिन्हे आहेत.
📊 आकड्यांचा खेळ: ठाकरेंचे ‘गड’ धोक्यात!
ओमराजे निंबाळकर शिंदे सेनेत जाताच स्थानिक पातळीवर मोठा भूकंप होणार आहे:
-
जिल्हा परिषद : जिल्हा परिषदेत ठाकरे सेनेचे एकूण ७ सदस्य आहेत. त्यापैकी तब्बल ४ सदस्य ओमराजेंचे कट्टर समर्थक असल्याने तेही शिंदेंच्या वाटेवर आहेत.
-
नगर परिषद : धाराशिव नगर परिषदेत ठाकरे सेनेचे ७ सदस्य आहेत, ज्यातील ५ सदस्य ओमराजेंचे निष्ठावंत आहेत. म्हणजेच नगर परिषदेतही ठाकरेंचे संख्याबळ धोक्यात आले आहे.
⚔️ आमदार विरुद्ध खासदार: निष्ठावंतांची तटबंदी!
एकीकडे स्थानिक पातळीवर ओमराजेंची हवा असली, तरी दुसरीकडे ठाकरे सेनेचे दोन्ही आमदार मात्र आपल्या निष्ठेवर ठाम आहेत. धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी या दोन्ही शिलेदारांनी ठाकरे सेनेतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ‘आमदार विरुद्ध खासदार’ असा थेट सामना रंगणार आहे.
🤔 समर्थकांची ‘तळ्यात-मळ्यात’ तर काहींची शांतता!
-
शहर प्रमुख सोमनाथ गुरव: ठाकरे सेनेचे शहर प्रमुख आणि ओमराजेंचे अत्यंत विश्वासू सोमनाथ गुरव यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
युवा प्रमुख रवी वाघमारे: युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रवी वाघमारे हे मात्र ठाकरेंसोबतच राहण्याची दाट शक्यता आहे.
🎯 निकालाची प्रतीक्षा अन् काऊंटडाऊन सुरू!
थोडक्यात सांगायचे तर, २० जूनच्या निकालानंतर धाराशिव शिवसेना ठाकरे सेनेत उभी फूट पडणार हे आता उघड झाले आहे. एक मोठा गट ओमराजेंचे नेतृत्व स्वीकारून ‘शिंदे’ वाटेवर जाणार, तर निष्ठावंत आमदारांचा गट ठाकरेंची मशाल विझू न देण्यासाठी मैदानात उतरणार. धाराशिवचा हा ‘क्लायमॅक्स’ नेमका काय वळण घेतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत!
“खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना (शिंदे) गटात येणार हे पक्के झाल्यानंतर, भाजपच्या निष्ठावंत गटात खुशी तर भाजप आमदार राणा पाटील गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.”





