तुळजापूर: तुळजापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून, गुरुवारी मध्यरात्री एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या रक्तरंजित थरारामुळे शहर हादरले असून, दुसरीकडे शहरात पुन्हा एकदा ‘एमडी ड्रग्ज’चा शिरकाव झाल्यानेच गुन्हेगारी वाढल्याचा गंभीर आरोप होत आहे. पोलिसांचा धाक ओसरल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्यरात्रीचा रक्तरंजित थरार
शहरातील जुनी कन्या प्रशाला परिसरात गुरुवारी मध्यरात्री पार्थ कऱ्हाडे (उपाध्ये पुजारी, वय अंदाजे २० ते २२ वर्षे, रा. रावळ गल्ली) या युवकावर अज्ञात हल्लेखोराने तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. हल्लेखोराने डोक्यावर वार केला असता, स्वतःचा बचाव करण्यासाठी पार्थने हात मध्ये घातला. यामुळे त्याच्या हाताच्या शिराही गंभीररीत्या कापल्या गेल्या आहेत.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पार्थला तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सद्यस्थितीत शस्त्रक्रिया सुरू आहे. तो अद्याप बेशुद्ध असल्याने हल्लेखोराची ओळख आणि हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
एमडी ड्रग्जचा सुळसुळाट आणि गुन्हेगारीचा आलेख
या वाढत्या गुन्हेगारीमागे अमली पदार्थांचा विळखा असल्याचे समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र साळुंके यांनी शहरात पुन्हा एकदा ‘एमडी ड्रग्ज’ची खुश्कीच्या मार्गाने वाहतूक व पुरवठा सुरू झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
-
तरुणांमधील वाढते व्यसन, चोऱ्या, घरफोडी, हाणामारी आणि आता हे जीवघेणे हल्ले यामागे ड्रग्जची साखळीच कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
-
“ड्रग्ज माफियांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे?” असा संतप्त सवाल साळुंके यांनी उपस्थित केला आहे.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा सवाल
शहरात खून, जबर हाणामारी, अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वेगाने वाढत आहे. पोलिसांचा कोणताही वचक उरलेला नसून दर एक-दोन दिवसांनी शहरात असे रक्तरंजित गुन्हे घडत आहेत. तुळजापूरची कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
-
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या गंभीर परिस्थितीत स्वतः लक्ष घालून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी.
-
पोलिसांनी तातडीने विशेष मोहीम राबवून शहरातील अमली पदार्थांचा (ड्रग्ज) पुरवठा मुळासकट नष्ट करावा.
तुळजापूरसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अशी दहशत निर्माण होणे ही चिंतेची बाब असून, पोलीस प्रशासन आता कोणती कठोर पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.







