धाराशिव | धाराशिव जिल्ह्यातील २०२५-२६ मधील कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी १५ कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्यानंतर कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईत २ जिल्हा कृषी अधीक्षक, ८ तालुका कृषी अधिकारी आणि ४ मंडळ कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
लातूर जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांनी सादर केलेल्या ७६ पानी चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चौकशीत मयत, भूमिहीन, दुबार आणि बिगर सभासद लाभार्थ्यांच्या नावावर कृषी निविष्ठांचे वाटप झाल्याचे समोर आले आहे.
हे अधिकारी कारवाईच्या कक्षेत
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील प्रभारी कृषी उपसंचालक पुरुषोत्तम वाघमारे, जिल्हा कृषी अधीक्षक राजकुमार मोरे, तत्कालीन प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक तथा उपविभागीय कृषी अधिकारी महादेव असलकर, जिल्हा सल्लागार सतीश सुरवसे, तंत्र अधिकारी राहुल दिवाणे आणि सहायक कृषी अधिकारी राहुल सूर्यवंशी यांना चौकशीत जबाबदार धरण्यात आले आहे.
आठ तालुका कृषी अधिकारी निलंबित
या कारवाईत खालील तालुका कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
- राजाराम बर्वे – तालुका कृषी अधिकारी, वाशी
- अतुल ढवळे – तालुका कृषी अधिकारी, भूम
- नानासाहेब लांगडे – तालुका कृषी अधिकारी, परंडा
- भागवत सरडे – तालुका कृषी अधिकारी, कळंब
- महेश देवकते – तालुका कृषी अधिकारी, धाराशिव व लोहारा
- ज्ञानोबा रितापुरे – तालुका कृषी अधिकारी, उमरगा
- आबासाहेब देशमुख – तालुका कृषी अधिकारी, तुळजापूर
चार मंडळ कृषी अधिकाऱ्यांचाही समावेश
निलंबनाची कारवाई खालील मंडळ कृषी अधिकाऱ्यांवरही करण्यात आली आहे.
- काटकर – मंडळ कृषी अधिकारी, अणदूर
- नागटिळक – मंडळ कृषी अधिकारी, काटी
- एस. जी. देशमुख – मंडळ कृषी अधिकारी, नळदुर्ग
- भोसले – मंडळ कृषी अधिकारी, तुळजापूर
घोटाळ्याची व्याप्ती
चौकशीत धाराशिव, तुळजापूर, कळंब, परंडा, भूम, वाशी, लोहारा आणि उमरगा तालुक्यांमध्ये लाखो रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय शेतकरी प्रशिक्षण, वेतन, शेडनेट आणि सेवा वर्ग योजनांमध्येही अनियमितता झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार कैलास पाटील यांनी केवळ निलंबन न करता संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करून त्यांच्याकडून शासनाची रक्कम वसूल करावी तसेच फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.




