धाराशिव: ‘आपला जीव धाराशिव’च्या नावाखाली सुरू असलेल्या प्रशासकीय मनमानीला आणि ५६ शाळांच्या गळचेपीला आता धाराशिवचे शिक्षक थेट रस्त्यावर उतरून उत्तर देणार आहेत. मागच्या भागात आपण पाहिलेच की, शाळा एकत्रीकरणाच्या फतव्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता याच संतापाचा उद्रेक एका मोठ्या आंदोलनात झाला असून, जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात ‘चलो धाराशिव’ चा नारा दिला आहे.
प्रशासनाच्या आणि झोपेचे सोंग घेतलेल्या नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी, धाराशिव जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने सोमवार, दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत थेट जिल्हा परिषद कार्यालयासमोर ‘लाक्षणिक धरणे आंदोलन’ पुकारण्यात आले आहे.
शिक्षकांच्या मागण्यांमधून प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल: शिक्षक संघटना समन्वय समितीने दिलेल्या अधिकृत निवेदनातून प्रशासनाच्या अनेक ‘प्रतापांची’ यादीच समोर आली आहे. या धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
-
शाळा एकत्रीकरणाचा घाट रद्द करा: एकाच कॅम्पसमधील एकत्रित करण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणेच स्वतंत्र ठेवण्यात याव्यात.
-
पदोन्नतीमधील ‘घोटाळा’ थांबवा: शिक्षण विस्ताराधिकारी पदोन्नतीमध्ये अनियमितता झाली असून, ती रद्द करून नव्याने सेवा ज्येष्ठता यादी तयार करावी आणि पदोन्नती प्रक्रिया नव्याने राबवावी.
-
कोरोनातील १ कोटी रुपये गेले कुठे?: कोरोना काळामध्ये शिक्षकांनी जमा केलेल्या तब्बल एक कोटीपेक्षा जास्त निधीचा प्रशासनाने काय आणि कुठे विनियोग केला, याचा पारदर्शक हिशोब द्यावा. (हा मुद्दा तर प्रशासनाचे वस्त्रहरण करणारा आहे!)
-
प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा: अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या निवड श्रेणीचा प्रश्न निकाली काढून पात्र शिक्षकांना त्याचा लाभ देण्यात यावा. तसेच, १२ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ तातडीने देण्यात यावा.
-
रिक्त पदे भरा: रिक्त असलेली भाषा, गणित व विज्ञान विषयाची प्राथमिक पदवीधर शिक्षकांची पदे प्राथमिक शिक्षकांतून दर्जावाढीने भरावीत.
-
जुनी पेन्शन व कोरोना पुरस्कार: १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीतील पात्र शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. तसेच, कोरोना काळातील प्रलंबित जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कारांचे तत्काळ वितरण करावे.
-
थकबाकी मंजूर करा: प्रलंबित पुरवणी देयकांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करून पूर्व निधी तात्काळ मंजूर करण्यात यावा.
नेते ‘फेसबुक लाईव्ह’वर, शिक्षक मात्र ‘रस्त्यावर’!
एकिकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि त्यांचे साहेब ‘व्हिजन २०३०’ चे फुसके गाजर दाखवत फेसबुक लाईव्हवर पोपटपंची करत आहेत, तर दुसरीकडे प्रत्यक्ष शिक्षण व्यवस्था सांभाळणारे शिक्षक मात्र स्वतःच्या हक्कांसाठी झेडपीच्या दारात धरणे धरून बसणार आहेत.
कोरोना काळात स्वतःच्या खिशातून एक कोटी रुपयांचा निधी देणाऱ्या शिक्षकांचे साधे प्रलंबित पुरस्कार द्यायलाही प्रशासनाकडे वेळ नाही. पण, दुसऱ्यांची टॅगलाईन आणि उपक्रम चोरून त्याचे इव्हेंट करण्यासाठी मात्र यांच्याकडे वेळच वेळ आहे. १० ऑगस्टच्या या ‘चलो धाराशिव’ आंदोलनानंतर तरी एसी केबिनमध्ये बसलेल्या प्रशासनाला आणि ‘व्हिजन’च्या धुंदीत असलेल्या नेत्यांना जाग येणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे!



