धाराशिव: एकीकडे ‘आपला जीव धाराशिव’ या गोंडस नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्याचे ढोल बडवले जात आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाने अत्यंत चलाखीने ५६ जिल्हा परिषद शाळांचा चक्क ‘गळा घोटण्याचा’ घाट घातला आहे. जिल्हा परिषदेच्या या ‘तुघलकी’ निर्णयामुळे जिल्ह्यातील ५६ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे धाबे दणाणले असले, तरी खासगी संस्थाचालक मंडळी मात्र खुशीत पेढे वाटण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगू लागली आहे!
शासन निर्णयाचा ‘सोयीस्कर’ आणि ‘चुकीचा’ अर्थ!
हा सगळा सावळा गोंधळ सुरू झाला तो ७ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयावरून. एकाच आवारात असलेल्या मुलांच्या आणि मुलींच्या स्वतंत्र शाळा एकत्र करून विद्यार्थ्यांना ‘सहशिक्षण’ (Co-education) घेता यावे, असा तो मूळ शासन निर्णय होता.त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी एक पत्र काढून स्पष्ट केले की, ज्या शाळा व्यवस्थापन समित्या (SMC) या एकत्रीकरणाला संमती देतील, त्याच शाळांचे प्रस्ताव पाठवावेत आणि त्यांचेच एकत्रीकरण करावे.
पण, आपल्या धाराशिव जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे ‘अजब गावची गजब कहाणी’! जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळा व्यवस्थापन समित्यांनी या एकत्रीकरणाला कडाडून विरोध दर्शवला आणि तसे अधिकृत ठरावही दिले. पण प्रशासनाने या ठरावांना केराची टोपली दाखवली. शासन निर्णयाचा अगदी चुकीचा आणि स्वतःच्या सोयीचा अर्थ लावून, थेट ५६ शाळांच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव ९ डिसेंबर २०२५ रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे पाठवून दिला. विशेष म्हणजे, शिक्षण आयुक्तांनीही या प्रस्तावाला ९ फेब्रुवारी २०२६ च्या आदेशान्वये डोळे झाकून मान्यता दिली आणि ५६ शाळांच्या सहशिक्षणाचा मार्ग मोकळा (?) केला.
‘एकत्रीकरण’ म्हणजे शिक्षकांवर कुऱ्हाड!
प्रशासनाला हे ‘एकत्रीकरण’ कितीही सोपे वाटत असले, तरी त्याचे परिणाम भयंकर आहेत. दोन शाळा एकत्र केल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची संख्या एकाच छताखाली येईल, पण याचा सर्वात मोठा फटका बसेल तो शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पदांना!
-
शाळा एकत्र झाल्याने शिक्षकांची पदे कमी होणार आहेत.
-
शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या गोरगरीब कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत.
-
ग्रामीण भागातील या ५६ शाळा एकप्रकारे बंदच पडणार असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मार्गात मोठे अडथळे निर्माण होणार आहेत.
शिक्षकांचा एल्गार: ‘एक जीव धाराशिव’ला कडाडून विरोध करण्याची तयारी
प्राथमिक शिक्षकांचे हे गंभीर प्रश्न सोडवण्याऐवजी प्रशासन त्यांच्यावर नवे प्रयोग लादत असल्याने शिक्षकांचा संयम आता सुटला आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत ‘समन्वय समिती’ स्थापन केली असून, प्रशासनाविरुद्ध मोठे आंदोलन उभारले आहे.
एवढेच नाही, तर प्रशासनाने वेळीच शहाणपण दाखवून ५६ शाळा एकत्रीकरणाचा हा अन्यायकारक निर्णय रद्द करून पूर्ववत शाळा सुरू न ठेवल्यास, भविष्यात जिल्हा परिषदेच्या ‘एक जीव धाराशिव’ या लाडक्या उपक्रमावरच थेट बहिष्कार टाकून त्याला कडाडून विरोध करण्याची तयारी या संघटनांनी चालवली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
एकूणच काय, तर ‘व्हिजन’च्या नावाखाली सुरू असलेला हा प्रशासकीय मनमानीचा ‘इव्हेंट’ आता शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे. प्रशासनाने हे शाळा बंदीचे धोरण थांबवले नाही, तर धाराशिवच्या शिक्षणाचे ‘तीन तेरा’ वाजायला वेळ लागणार नाही!



