धाराशिव : जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून उमरगा, येरमाळा आणि शिराढोण पोलीस ठाण्यांतर्गत लुटमारीचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. उमरगा बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन एका व्यापाऱ्याची बॅग कापून २ लाख ३५ हजार रुपये चोरल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तर येरमाळा येथे दर्शनासाठी आलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत.
बॅग कापून रोकड लंपास
लातूर येथील ‘अशोका इंटरप्रायजेस’चे कर्मचारी महताब उस्मान शेख (रा. सुगाव, ता. चाकूर) हे उमरगा येथील किराणा दुकानदारांकडून वसुली केलेले ३ लाख रुपये बॅगेत घेऊन लातूरला जाण्यासाठी शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी बसस्थानकावर आले होते. बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग कापली आणि त्यातील २ लाख ३५ हजार रुपयांची रोकड पळवली. याप्रकरणी उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
येडेश्वरी देवीच्या दर्शनावेळी दागिने चोरीला
सोलापूर येथील सुरेखा प्रशांत जाधव (रा. बुधवार पेठ) या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. कल्लोळ जवळ दर्शन घेत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठाण शिताफीने चोरून नेले. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने हा हातसाफ केला.
पवनचक्कीचे दीड लाखाचे नुकसान
येरमाळा पोलीस ठाण्यांतर्गतच दुसरी घटना तेरखेडा शिवारात घडली. येथील शेत गट क्र. ६३८ मधील पवनचक्कीचे केबल कापून तांब्याचे साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. चोरी यशस्वी झाली नसली तरी, पवनचक्कीचा दरवाजा आणि इतर साहित्याचे चोरट्यांनी १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान केले आहे. याप्रकरणी दत्तात्रय माने (रा. वाई, जि. सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
घरासमोरून बोकड चोरीला
शिराढोण पोलीस ठाणे हद्दीतील ताडगाव (ता. कळंब) येथेही चोरीची घटना घडली. घनश्याम रामहरी जाधवर यांचे २० हजार रुपये किमतीचे बोकड शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेले.
जिल्ह्यातील या वाढत्या घटनांमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. वरील सर्व प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.






