धाराशिव भाजपमधला राजकीय ‘गेम ऑफ थ्रोन्स’ आता अशा वळणावर आलाय, जिथे स्क्रिप्ट रायटरलाही घाम फुटेल! कालपर्यंत ‘मल्हार पर्व’ आणि ‘भावी खासदार’च्या हवेत उडणाऱ्या राहुल काकडेंची तडकाफडकी विकेट पडली. पण खरी गंमत तर पुढेच आहे. काकडेंचा राजीनामा न घेताच, रात्रीत त्यांच्या जागी गणेश इंगळगी यांची वर्णी लागली. यावर आता भाजपमध्येच ‘दत्ताभाऊ लिमिटेड पार्टी’चे आरोप सुरू झाले आहेत. पण या सगळ्या राड्यात खरा गेम काय झालाय, हे समजल्यावर तुम्हालाही सायलेंट किलर दत्ताभाऊंना मानल्याशिवाय राहवणार नाही!
‘सनी पवार’चा सवाल: “अध्यक्ष दोन आहेत की सिद्धीविनायक परिवाराची पार्टी?”
काकडेंची विकेट पडताच, एका भाजप नगरसेविकेचे दीर आणि युवा कार्यकर्ते सनी ऊर्फ सुनील पवार यांनी थेट बंडाचा झेंडा फडकवला. त्यांचा सवाल एकदम लॉजिकल आणि बोचरा होता:
“अवघ्या ६ महिन्यांपूर्वी निवड झालेल्या अध्यक्षाचा राजीनामा घेतला नाही, तर मग जिल्ह्यात युवा मोर्चाचे दोन अध्यक्ष आहेत का? कुणाच्या मुलाखती नाहीत, बैठक नाही, थेट नियुक्ती! ही काय सिद्धीविनायक परिवाराची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? ‘दत्ता कुलकर्णी लिमिटेड पार्टी’ अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होऊ देऊ नका!”
सनी ऊर्फ सुनील पवारच्या या सवालाने दत्ताभाऊंच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले खरे, पण दत्ताभाऊंनी जो ‘बाण’ सोडलाय, त्याने थेट राणा पाटलांच्याच घरातल्या ‘दोन सरकारां’मध्ये ठिणगी टाकली आहे!
दोन चिरंजीव: ‘बडे सरकार’ विरुद्ध ‘छोटे सरकार’!
हा गेम समजण्यासाठी राणा साहेबांच्या घरातला भूगोल समजणे महत्त्वाचे आहे. साहेबांना दोन चिरंजीव आहेत.
-
बडे सरकार (मल्हार पाटील): जे राजकारणात सक्रिय आहेत आणि ‘भावी खासदार’ म्हणून मिरवत आहेत.
-
छोटे सरकार (मेघ पाटील): ज्यांना समाजकारणाची आवड आहे.
नगरपालिका निवडणुकीपूर्वी मेघ पाटील यांनी “एक फोन कॉल करा, समस्या सॉल्व्ह” असा उपक्रम चालवला होता. यात ते चक्क स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करत होते! पण साहेबांनी (राणा पाटील) त्यांना बोलावून कडक शब्दांत समजावले, “अरे बाळा, राजकारण हा आपला ‘व्यवसाय’ आहे. तू इथे स्वतःचे पैसे का उधळत आहेस?” असा ब्रेक लावून साहेबांनी मेघ पाटलांना थेट नेरूळला पाठवून दिले.
गेले काही दिवस शांत असलेल्या मेघ यांनी नुकतीच दिल्लीतील एका सीजेपी (CJP – कॉकरोच जनता पार्टी) आंदोलनावर पोस्ट करून थेट व्यवस्थेला सवाल विचारला- “स्त्रिया आणि लहान मुलांना मारहाण करून तुमच्या नाजूक अहंकाराला बळ मिळतं का?” शेवटी साहेबांनी पुन्हा एकदा कान पिळल्यानंतर छोटे सरकारांना ती पोस्ट डिलीट करावी लागली.
सायलेंट किलर दत्ताभाऊंचा ‘मास्टरस्ट्रोक’!
आता खरा ट्विस्ट ऐका! दत्ताभाऊ कुलकर्णी हे राजकारणातले ‘सायलेंट किलर’ आहेत. त्यांनी एका दगडात दोनच काय, अख्खं झाडच हलवून सोडलंय.
-
ज्यांना पदावरून काढले, ते राहुल काकडे हे ‘बडे सरकार’ मल्हार पाटील यांचे कट्टर समर्थक होते.
-
आणि ज्यांना पद दिले, ते गणेश इंगळगी हे ‘छोटे सरकार’ मेघ पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत!
‘प्रायव्हेट लिमिटेड’ला तोंड दाबून बुक्क्यांचा मार!
दत्ताभाऊंनी अतिशय शिताफीने हे पद ‘मल्हार पर्वा’कडून काढून ‘मेघ पर्वा’च्या पारड्यात टाकले. यामुळे आता राणा पाटील आणि माऊली (अर्चना पाटील) यांची अवस्था अक्षरशः ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करण्यासारखी झाली आहे.
कारण, जर त्यांनी राहुल काकडेंना काढल्याचा विरोध केला, तर त्यांना धाकट्या लेकाच्या मित्राच्या (गणेश इंगळगीच्या) नियुक्तीला विरोध करावा लागेल. घरातल्या मोठ्या लेकाच्या मित्राकडून पद काढून ते धाकट्या लेकाच्या मित्राला दिले गेल्यामुळे, आता साहेब आणि माऊली उघडपणे काहीही बोलू शकत नाहीत! कुणाला ओरडावं अन् कुणाला थोपटावं, अशी ‘धर्मसंकट’ अवस्था राणा कुटुंबाची झाली आहे.
आता राहुल काकडेंनी न्याय मागायचा कुणाकडे?
यात सर्वात मोठी गोची झालीये ती बिचाऱ्या राहुल काकडेंची! कालपर्यंत ज्या ‘मल्हार दादां’च्या जिवावर ते उड्या मारत होते, ते दादाही आता आपल्या धाकट्या भावाच्या मित्राविरुद्ध (गणेश इंगळगीविरुद्ध) उघडपणे बोलू शकत नाहीत.
आता प्रश्न पडतो की, ‘मल्हार पर्व’ची गाणी गाणारे राहुल काकडे आता कुठे आणि कुणाकडे न्याय मागणार? साहेबांचे दरवाजे तर ‘फॅमिली मॅटर’मुळे बंद झाले आहेत! या राजकीय बुद्धिबळात दत्ताभाऊंनी राणा गटाला त्यांच्याच घरात कसा ‘चेकमेट’ दिलाय, याचीच चर्चा आता धाराशिवच्या कट्ट्यांवर रंगत आहे!





