धाराशिव: शहरात स्वतःला ‘झिरो पोलीस’ म्हणवून घेत पोलिसांच्या नावावर उच्छाद मांडणाऱ्या एका विकृताचा आणखी एक संतापजनक कारनामा उघडकीस आला आहे. एका ३६ वर्षीय नोकरदार महिलेचा भररस्त्यात पाठलाग करून, तिचा हात धरून ओढाओढी करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये शनिवारी दुपारी घडली आहे. या गंभीर प्रकरणी सुरुवातीला नेहमीप्रमाणे सुस्त बसलेल्या पोलिसांना अखेर ‘धाराशिव लाईव्ह’ने दिलेल्या दणक्यानंतर जाग आली आणि आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल करताना आणि त्यानंतर पोलिसांनी जी काही ‘मेहेरबानी’ आरोपीवर दाखवली आहे, ती पाहता धाराशिव पोलीस पीडितेच्या पाठीशी उभे आहेत की गुन्हेगाराच्या? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
पीडिता मागासवर्गीय असतानाही ‘ॲट्रॉसिटी’चे कलम गायब!
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, पीडित महिला ही मागासवर्गीय समाजातील आहे. कायद्यानुसार, अशा परिस्थितीत आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करणे बंधनकारक असते. मात्र, आनंदनगर पोलिसांनी जाणीवपूर्वक आणि अत्यंत संशयास्पद रित्या एफआयआर (FIR) मधून ॲट्रॉसिटीचे कलम वगळले आहे. कायद्याचे रक्षकच जेव्हा गुन्हेगाराला कायदेशीर पळवाट शोधून देतात, तेव्हा सर्वसामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
भरदुपारी जिल्हा परिषदेजवळ विनयभंग
पीडित ३६ वर्षीय महिला एका खासगी नेत्रालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ती जिल्हा परिषदेच्या बाजूच्या रस्त्यावरून परत हॉस्पिटलकडे ड्युटीवर जात होती. त्याच वेळी संबंधित ‘झिरो पोलीस’ हा मोटारसायकलवरून (क्र. MH 13 CL 8170) मागून आला. त्याने पीडित महिलेचा पाठलाग करत तिला भररस्त्यात अडवले, तिचा मोबाईल नंबर मागितला आणि “तू काय अप्सरा लागून गेली आहेस का?” असे म्हणत महिलेचा डावा हात धरून ओढाओढी करण्यास सुरुवात केली. महिलेने आरडाओरडा केल्याने तिचा एक ओळखीचा माणूस तिथे धावून आला, त्याला पाहून तो तिथून पळून गेला.
-
पीडितेच्या भावाने पकडून देऊनही पोलिसांनी आरोपीला सोडले; दुचाकी जप्त, तो स्वतः फरार!
-
नाव माहीत असूनही FIR मध्ये ‘अनोळखी’ दाखवले; गुन्ह्यातील दुचाकी वडिलांच्या नावावर
-
आरोपी आणि आनंदनगर पोलिसांचे थेट ‘साटेलोटे’; पीडित महिलेच्या भावाचा खळबळजनक आरोप
-
‘धाराशिव लाईव्ह’च्या दणक्यानंतर गुन्हा दाखल, मात्र पोलिसांच्या हेतूवरच मोठे प्रश्नचिन्ह
भावाने पकडून दिले, पोलिसांनी पोलीस ठाण्यातून सोडून दिले!
या घटनेनंतर पीडित महिलेच्या भावाने तात्काळ धाडस दाखवून त्या ‘झिरो पोलीस’ला पकडले आणि थेट आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन पोलिसांच्या हवाली केले. आरोपी पोलिसांच्याच समोर उभा होता आणि त्याचे नाव-गाव पोलिसांना स्पष्टपणे माहीत होते. मात्र, तरीही आनंदनगर पोलिसांनी एफआयआर (FIR) मध्ये त्याचे नाव न लिहिता त्याचा उल्लेख ‘अनोळखी इसम’ असा केला. धक्कादायक बाब म्हणजे, ‘धाराशिव लाईव्ह’च्या दणक्यानंतर पोलिसांनी रात्री ९:०२ वाजता गुन्हा तर दाखल केला, मात्र आरोपीला अटक न करता थेट पोलीस स्टेशनमधून सन्मानपूर्वक सोडून दिल्याचे आता समोर आले आहे.
दुचाकी जप्त, आरोपी फरार; दुचाकी वडिलांच्या नावावर
पोलिसांनी स्वतःच्या हाताने आरोपीला सोडून दिल्यानंतर आता तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचा बनाव करत आहेत. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे, मात्र तपासात ही दुचाकी संबंधित ‘झिरो पोलीस’च्या वडिलांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीचे नाव माहीत असताना एफआयआरमध्ये ‘अनोळखी’ दाखवणे, ॲट्रॉसिटीचे कलम गाळणे आणि त्याला पोलीस स्टेशनमधून पळून जाण्यास मदत करणे, यावरून पोलिसांच्या हेतूवरच तीव्र संशय व्यक्त केला जात आहे.
आनंदनगर पोलिसांसोबत साटेलोटे; पीडितेच्या भावाचा थेट आरोप
संबंधित आरोपी हा शहरात ‘झिरो पोलीस’ म्हणून वावरतो. यापूर्वीही आठवडे बाजारात पोलिसांच्या सांगण्यावरून व्यापाऱ्यांकडून लाच (हप्ता) गोळा केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर झालेला आहे. आता या विनयभंगाच्या प्रकरणातही सदर ‘झिरो पोलीस’ आणि आनंदनगर पोलिसांचे थेट ‘साटेलोटे’ (अर्थात आर्थिक व्यवहार) असल्याचा थेट आणि खळबळजनक आरोप पीडित महिलेच्या भावाने केला आहे. पोलिसांच्या याच वरदहस्तामुळे आणि साटेलोट्यामुळे आरोपीला पाठीशी घातले जात आहे, असे पीडितेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
‘धाराशिव लाईव्ह’च्या दणक्यानंतर पोलिसांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ७५(१) आणि ७८(१) अंतर्गत गुन्हा (रजिस्टर क्र. ०२१५/२०२६) तर दाखल केला आहे. परंतु, कायदेशीर प्रक्रिया बाजूला ठेवून आरोपीला सोडून देणाऱ्या आणि ॲट्रॉसिटी कलम गाळणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर आता वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार? आणि फरार झालेल्या ‘झिरो पोलीस’ला पोलीस कधी बेड्या ठोकणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




