येरमाळा : राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या येथील श्री येडेश्वरी देवी मंदिर परिसरात पुन्हा एकदा ‘टायगर गेम’ या बेकायदेशीर जुगाराने डोके वर काढले आहे. मंदिर परिसरातच राजरोसपणे जुगाराचे अड्डे सुरू झाल्यामुळे देवस्थानच्या पावित्र्याला गालबोट लागत असून, भाविक व ग्रामस्थांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या वर्षी याच मंदिर परिसरात जुगारावरून पुणे येथील काही महिला भाविक आणि जुगाऱ्यांमध्ये जोरदार वाद आणि झटापट झाली होती. या घटनेचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाल्याने देवस्थानची मोठी बदनामी झाली होती. या गंभीर प्रकारानंतर येरमाळा पत्रकार संघाने थेट राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन हा प्रकार तात्काळ थांबवण्याची मागणी केली होती. मात्र, देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिसांनी हा प्रकार कायमस्वरूपी थांबवण्यासाठी कोणतीही ठोस कागदोपत्री कारवाई केली नाही. परिणामी, नुकत्याच पार पडलेल्या पौर्णिमा यात्रेनंतर या भागात जुगाराचे टेबल पुन्हा थाटल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय
गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे, जुगाराचे टेबल सुरू असल्याचे फोटो पोलिसांना पाठवले, की पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत तेथून टेबल हटवले जातात. त्यानंतर पोलिसांकडून ‘आम्ही गेलो होतो, तिथे कोणीही आढळून आले नाही’ असे ठरलेले उत्तर दिले जाते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा, देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत यांचे जुगाऱ्यांशी हितसंबंध आहेत का? असा गंभीर सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
इन्स्टाग्राम रीलने उघड केली पोलखोल
पोलिसांच्या ‘आळीमिळी गुपचिळी’ भूमिकेचा भांडाफोड मंगळवारी एका भाविकाच्या इन्स्टाग्राम रीलमुळे झाला आहे. या भाविकाने तयार केलेल्या आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या रीलमध्ये, मंदिर परिसरात टायगर गेमचे टेबल उघडपणे सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आता थेट पोलिसांनाच कोंडीत पकडले असून, “हा बघा टेबलाचा पुरावा, आता तरी कारवाई करणार का?” असा थेट जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.
भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
जुगाराच्या या वाढत्या प्रकारांमुळे मंदिर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या सामान्य भाविकांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित जुगार तात्काळ बंद करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ, भाविक आणि पत्रकारांकडून केली जात आहे.






