धाराशिव – कर्नाटकातून दिल्लीकडे वाहतूक केली जाणारी तब्बल २७५ टन निकृष्ट दर्जाची सुपारी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या पथकाने धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्गजवळ पकडली. जप्त करण्यात आलेल्या सुपारीची किंमत सुमारे २ कोटी ५१ लाख रुपये इतकी आहे. ही कारवाई रविवारी (दि. ३०) नळदुर्ग परिसरातील फुलवाडी टोलनाक्यावर करण्यात आली. या मोठ्या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसायाशी संबंधित घटकांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातून २८ ट्रक सुपारी घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाले होते. प्रत्येक ट्रकमध्ये अंदाजे २५ टन सुपारी होती. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी फुलवाडी टोलनाक्यावर सापळा रचला. रविवारी सकाळी एकामागून एक येणाऱ्या या २८ ट्रक्सना थांबवून त्यांची तपासणी केली असता, त्यामधील सुपारी अत्यंत निकृष्ट दर्जाची आणि खराब असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, ही सुपारी लाल रंगाची असून, तिचा वापर गुटख्यामध्ये केला जातो.
एफडीएच्या पथकाने रात्री उशिरापर्यंत कारवाई करत सर्व २८ ट्रक्समधील सुमारे २७५ टन सुपारी जप्त केली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही एफडीएला सहकार्य केले. जप्त करण्यात आलेल्या सुपारीची एकूण किंमत २ कोटी ५१ लाख ९७ हजार ३०० रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सहायक आयुक्त (अन्न) प्रदीप कुटे यांनी सांगितले की, “पकडलेली सुपारी प्रथमदर्शनी खराब आणि निकृष्ट दर्जाची वाटत आहे. यामध्ये भेसळीसाठी रासायनिक रंगाचा वापर केला गेला आहे का, हे तपासण्यासाठी सुपारीचे नमुने सोमवारी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.”
दरम्यान, या कारवाईमुळे भेसळयुक्त पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धाराशिव जिल्ह्यात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने भेसळ करणाऱ्यांचे फावत असल्याचे बोलले जात आहे. या मोठ्या कारवाईमुळे अवैध सुपारी आणि गुटखा वाहतुकीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.