तुळजापूर: तुळजापूर शहरात वाढत्या खून, चोऱ्या, लूटमार आणि अवैध धंद्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या वाढत्या गुन्हेगारीला तुळजापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करत महाविकास आघाडी आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
भाविकांची लूट आणि महिलांमध्ये असुरक्षितता
महाविकास आघाडी व घटक पक्षांनी दिलेल्या या निवेदनात नमूद केले आहे की, श्रीक्षेत्र तुळजापूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने रस्त्यात अडवून दिवसा व रात्री लूटमारीचे प्रकार वारंवार घडत आहेत. तसेच भरदिवसा महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला जात आहेत. भर चौकात आणि रहदारीच्या रस्त्यावर जीवघेणे हल्ले करणे, हात-पाय मोडणे आणि डोके फोडण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, यापैकी एकाही गुन्ह्याचा अद्याप तपास लागलेला नाही.
अवैध धंद्यांना ऊत आणि विद्यार्थ्यांमध्ये दहशत
शहरात नियमबाह्य पद्धतीने ड्रग्स, दारू, गांजा इत्यादी अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असून व्यसनाधीनतेचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे महिला, लहान मुले आणि तरुण विद्यार्थिनींना शहरात वावरणे कठीण झाले आहे. या गुन्हेगारीमुळे बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनात मोठी दहशत निर्माण झाली असून, शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
पोलिसांच्या कार्यप्रणालीवर थेट प्रश्नचिन्ह
तुळजापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी या लुटमारीत हातमिळवणी करत असल्याचा थेट आरोप निवेदनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस खाते आणि गुप्तचर यंत्रणा या सर्व बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने वाईट प्रवृत्तीच्या गुंडांवर कायद्याचा कोणताही वचक राहिलेला नाही. सत्य समोर आणण्यासाठी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ‘नार्को टेस्ट’ (Narco Test) करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे
जनआंदोलनाचा इशारा
शहरातील कायदा-सुव्यवस्था पूर्ववत करून तुळजापूर शहर व तालुका भयमुक्त करण्यासाठी संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर यावर कारवाई झाली नाही, तर नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन स्वतः जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले असून, यावर अॅड. धीरज आ. कदम-पाटील, अमर अशोकराव मगर, अमोल माधवराव, रणजीत चंद्रकांत इंगळे, नागनाथ, शाम अंबादासराव पवार, आनंद जगताप, बालाजी, भालचंद मगर, आनंद रोचकरी, सुदर्शन वाघमारे यांसह काँग्रेस व महाविकास आघाडीच्या अनेक स्थानिक पदाधिकारी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.






