उमरगा : शहरातील ओम बालाजी मंगल कार्यालयासमोरून भरदिवसा एका अज्ञात चोरट्याने दुचाकी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. ७) उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर भाऊराव सुरवसे (वय ५७, रा. जुनी पेठ, उमरगा, जि. धाराशिव) हे कामानिमित्त शहरात गेले होते. त्यांनी आपली काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. एमएच २५ एएन ४०१७) ही दुचाकी बुधवारी (ता. ६) दुपारी १२ ते २ वाजेच्या सुमारास ओम बालाजी मंगल कार्यालय येथे उभी केली होती. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून अंदाजे २३ हजार ९५५ रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी दिगंबर सुरवसे यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाशीत पवनचक्कीची ५ लाखांची केबल चोरी; कंपनीचे ३४ लाखांचे नुकसान
वाशी : खानापूर शिवारातील पवनचक्कीची तब्बल ५ लाख रुपये किमतीची केबल चोरून नेल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी केलेल्या या कृत्यामुळे संबंधित कंपनीचे सुमारे ३४ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खानापूर शिवारातील गट क्रमांक १४० मध्ये पवनचक्की कंपनीचा केटी/०१ हा पॉईंट आहे. या ठिकाणाहून ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी २२ मीटर लांबीचे रोटा रेटर केबल वायरचे एकूण २४ बंडल (किंमत ५ लाख रुपये) चोरून नेले. या चोरीमुळे आणि तोडफोडीमुळे पवनचक्की कंपनीचे तब्बल ३४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी बाळाजी बाळासाहेब मोरे (वय २७, रा. इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी गुरुवारी (ता. ७ मे) दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) आणि ३२४(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मोठ्या चोरीचा अधिक तपास वाशी पोलीस करत आहेत.







