‘माऊली’ अर्थात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या एका व्हॉट्सॲप स्टेटसने धाराशिव भाजपमध्ये जो राजकीय वणवा पेटवला, त्याची धग थेट मुंबईतील हायकमांडपर्यंत पोहोचली. निष्ठावंतांनी दिलेले सडेतोड उत्तर, विनोद गपाट यांचा ऐतिहासिक ‘दे दणादण’ आणि वरिष्ठांची वक्रदृष्टी पाहता, हे प्रकरण आता आपल्या चांगलेच अंगलट आल्याची जाणीव राणा गटाला झाली. मग काय? डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ‘माऊलीं’नी थेट युटर्न घेतला आणि असा काही भन्नाट खुलासा केला, की वाचून लोकांची हसून हसून पुरेवाट झाली!
खुलासा की विनोद? “ती पोस्ट टीमनेच टाकली हो!”
राजकारणात एक अलिखित नियम असतो- ‘खोटं बोल, पण रेटून बोल!’ याच नियमाचे तंतोतंत पालन करत माऊलींनी एक भलीमोठी पोस्ट टाकून सारवासारव केली. त्यांनी म्हटले,
“मी सध्या माझ्या मुलाच्या पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी परदेशात आहे. वेळेतील फरकामुळे माझ्या सोशल मीडिया टीमने माझी पूर्वपरवानगी न घेता, अनवधानाने माझ्या अधिकृत स्टेटसवर तो मजकूर प्रसिद्ध केला. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. पक्ष आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हीच माझी प्राथमिकता राहील.”
‘आयफोन’ परदेशात अन् व्हॉट्सॲप हँडलर धाराशिवमध्ये?
माऊलींचा हा खुलासा वाचून धाराशिवची जनता मात्र डोक्याला हात लावून बसली आहे. जर ही पोस्ट फेसबुक किंवा ट्विटर (X) पेजवर आली असती, तर एकवेळ लोकांनी मान्य केले असते की चला, पीआर टीमची चूक झाली असावी. पण अहो, व्हॉट्सॲप स्टेटस? तेही ‘माऊलीं’च्या स्वतःच्या पर्सनल मोबाईलवरून?
माऊली स्वतः परदेशात दौऱ्यावर असताना त्यांचा पर्सनल ‘आयफोन’ त्यांनी इथे धाराशिवमध्ये कोणत्या पीआर वाल्याच्या हातात दिला होता का? की टीमने थेट परदेशातून त्यांचा व्हॉट्सॲप ऑपरेट केला? थोडक्यात काय, तर ‘आलं अंगावर, की ढकल टीमवर!’ हा जुनाच फॉर्म्युला इथे वापरण्यात आला. यांची सोशल मीडिया टीम दुसऱ्यांवर भुंकते हे सर्वांना माहीत होते, पण तीच टीम आता माऊलींनाच असे गोत्यात आणेल, याचा विचार कुणी केला नव्हता.
नेटिझन्सची फिरकी: “लोकांना येड्यात काढायचं कधी बंद करताय?”

हा बालिश खुलासा समोर येताच सोशल मीडियावर नेटिझन्सनी अक्षरशः पिसे काढली आहेत. एकाने तर अर्चना पाटील यांच्या पोस्टवरवरच थेट निशाणा साधत कमेंट केली:
“अब आयेगा मजा…. पण ते लोकांना येड्यात काढायचं कधी बंद करताय? स्वतःच्या मोबाईलचं स्टेटस दुसरं कोणी कशाला ठेवेल?”
जनतेचा हा थेट सवाल राणा समर्थकांना निरुत्तर करणारा आहे.
सर्व फजितीच्या मुळाशी साहेबांची ‘ब्लंडर बँक’!
आता प्रश्न पडतो की, अशा आत्मघातकी चुका राणा पाटील आणि अर्चना पाटील यांच्याकडून वारंवार का होत आहेत? तर याचे उत्तर त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या ‘अष्टप्रधान मंडळात’ दडले आहे.
धाराशिवच्या राजकीय वर्तुळात या सल्लागार मंडळाला लोक प्रेमाने ‘ब्लंडर बँक’ (Blunder Bank) म्हणतात! हीच ती ‘ब्लंडर बँक’ आहे, जी राणा साहेबांना नेहमी चुकीचे सल्ले देते. इकडे तिकडे ‘कानफुंकी’ करणे, निष्ठावंतांबद्दल साहेबांचे कान भरणे आणि स्वतःच्याच नेत्याला खड्ड्यात घालणे, यात या टीमचा हातखंडा आहे. माऊलींचे ते वादग्रस्त स्टेटस आणि त्यानंतर आलेला हा हास्यास्पद खुलासा, हा याच ‘ब्लंडर बँके’चा नवा पराक्रम असल्याची चर्चा आता रंगली आहे.
थोडक्यात, ‘स्टेटस’ तर डिलीट झाले आणि दिलगिरीही व्यक्त झाली, पण निष्ठावंतांच्या मनातील ‘खदखद’ आणि जनतेच्या मनातील ‘संशय’ मात्र डिलीट झालेला नाही. आता या ब्लंडर बँकेच्या सल्ल्याने राणा गट सुनील राणेंच्या बैठकीत कोणता नवा ‘ब्लंडर’ करतो, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे!
माऊली’चा व्हॉट्सॲप बाण, मुंबईतली ‘ती’ रहस्यमयी फाईल आणि निष्ठावंतांचे ‘ओपन चॅलेंज’!




